नाशिक : विद्या प्रशाला (हायस्कूल) व ज्युनिअर कॉलेज, तळेगांव (अंजनेरी) या विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेच्या वेळेत बस नसल्यामुळे गैरसोय होत आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत राज्य परिवहन महामंडळाची बस नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थिवर्गाचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. त्यामुळे दहेगांव, मुळेगांव परिसरातून सकाळी दहा वाजता व अंजनेरी गावातून शाळेच्या जवळून सायंकाळी पाच वाजता बस सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन २८ जून रोजी नाशिक येथील राज्य परिवहन आगाराचे व्यवस्थापक राजेश शिलावट यांना देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, मनसे पदाधिकारी सागर कोठावदे, मनसे गणअध्यक्ष संतोष रहाडे , मनसेचे दहेगांवचे कार्याध्यक्ष, अप्पासाहेब रहाडे आदी सहपदाधिकारी, सहकारी उपस्थित होते.
शाळा सुरू होऊन १५ दिवस झाले असल्यामुळे लवकरात लवकर बस सुरू न झाल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व दहेगांव येथील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.